वनवा

वनवा

 वनवा समानार्थी शब्द: आग ,अनल ,वन्ही,वैशवानर ,विस्तव, आग व पावक,दानावल, अग्नी होय .







वनवा:आग लागण्याची कारणे : आपल्याकडे साधारणता उन्हाळ्यात मार्च ,एप्रिल, मे या महिन्यात आग लावल्याचे दिसून येते. झाडांच्या फांद्या व झाडातील घर्षणामुळे झाडांना आग लागते किंवा झाड पेट घेते. पण यामुळे आग लागण्याचे फारशी उदाहरणे नाहीत. अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलियातील जंगलांना मोठी आग लागल्याचे आपण टीव्हीवर किंवा बातम्यांमध्ये पाहिलेच आहे .यामुळे एक ना अनेक गोष्टीची अपरिमित हानी झाल्याचे दिसून आले .  ही आग एक दोन दिवसाची नव्हती तर बरेच दिवस येथील जंगल जळत होते.  विज पडल्यामुळेही जंगलांना आग लागते .मुख्यतः मानवाकडून आग लावण्याचे मुख्य कारण दिसून आले आहे. जंगलात जेवणावळी करतेवेळी आग लागते किंवा जंगलातील पेटवलेल्या चुली न विजवता जाणे. सिगारेट ,बिडीची थोटके तसेच जंगलात टाकून देणे. वनाशेजारी असलेल्या शेतात पाला - पाचोळा पेटवताना योग्य ती काळजी न घेणे .काही वेळा मुद्दाम जंगलात आग लावली जाते .काही वेळा वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे जंगलात आग लावली जाते. जंगलातील गवतास आग लावल्यामुळे पुढल्या वेळेस गवत चांगले येते ,या भ्रमातूनही आग लावली जाते .घरातील जळावू लाकूड किंवा इंधन म्हणून लाकूड फाटा मिळावा यासाठी जंगलांना आगी लावल्या जातात. बऱ्याच वेळा आग लावल्यानंतर पुन्हा चांगला फुटवा येतो असा चुकीचा गैरसमज असल्यामुळे आग लावतात. तसेच खत निर्माण होते असा समाज असल्यामुळे ही आग लावली जाते. वनाशेजारी असलेल्या शेतात घाण पेटवल्यानंतर ती विझल्याचे खात्री न करता निघून जाणे. तेथील ठिणगी उडून जंगलात जाते व जंगल पेट घेते. काही वेळा जंगलातील मधाचे पोळे काढण्यासाठी आग पेटवली जाते. जेणेकरून मधमाशा चावा घेऊ नयेत. काही लोक मुद्दाम दरवर्षी जंगलांना आगी लावतात. परवाच पन्हाळागडाच्या सज्जा कोटीच्या खालील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली होती .ती आग कोणीतरी आज्ञाताने लावली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. जंगल माफिया जंगलात मुद्दाम आग लावतात, कारण आग लागल्यामुळे जागा मोकळी होऊन त्यांना ती वापरात आणता येईल. वन खाते व आदिवासी यांच्यातही जमिनीच्या अधिकारावरून संघर्ष होऊन आदिवासी जंगलात आगी लावतात.  जंगला शेजारच्या खेडेगावातील गुराखी पुढील वर्षासाठी चांगले गवत यावे म्हणून जंगलास पेटवतात.









वनवा किंवा आग कोणत्या ठिकाणी लागते? 

    जंगल किंवा वनात लागणाऱ्या मोठ्या आगीच्या रूपाला वनवा  म्हटले  जाते. मोठमोठ्या गवती रानात लागलेल्या आगीला सुद्धा  वनवा म्हटले जाते .शेतातील उसाच्या मोठ्या क्षेत्र असलेल्या ठिकाणी आग लागल्यास वनवा लागला असे म्हणतात. आग, किंवा वनवा वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे वारा होय. ज्या ठिकाणी आग लागली आहे ,अशा ठिकाणी वारा वेगाने वाहत असेल तर आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते .यामुळे वाळल्या सोबत ओलेही  पेटते. यावेळी आग आटोक्यात आणणे अवघड होऊन बसते.



  #जंगलात लागलेल्या वनव्यामुळे होणारे तोटे#

        जंगलांतील वृक्षसंपदा नष्ट होते .मुळातच जंगलांचे प्रमाण कमी होत चालले असताना वनवा किंवा आग लागल्यामुळे जंगल कमी होत आहे .जंगल क्षेत्र कमी होत आहे. जंगलातील झाडांचे प्रमाण नगन्य होत आहे .जंगले नष्ट होत असल्यामुळे पावसाचे प्रमाण देखील कमी होत आहे .अलीकडे वन कमी झाल्यामुळे हवामानात बदल झाला आहे. वातावरणात बदल झाला आहे. ऋतुचक्रही बदलत आहे .यामुळे एक ना अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन इतर विषारी वायू चे प्रमाण वाढत आहे .पृथ्वीचे तापमान वाढत आहे .पशुपक्षी यांची निवासस्थाने नष्ट होत आहेत. वाघ, बिबट्या ,गवारेडे , खवल्या मांजर ,तरस अशा प्राण्यांचा जंगलातील आदिवास नाहिसा होत आहे.  यामुळे असे प्राणी मानवी वस्तीकडे आकर्षित होत आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांचीही आहूती जाते .पक्षांची घरटी, पिल्ली, अंडी नष्ट होतात .जळून खाक होतात .दुर्मिळ अशा औषधी वनस्पतीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत . दुर्मिळ फळझाडे जळून खाक होतात. मोठमोठ्या आगी लागल्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो जो आपल्या शरीरास घातक असतो. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते .वृक्षांची मुळे जमिनीला घट्ट पकडून न राहता पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जाते. त्याबरोबर जमिनीतील कसही निघून जातो. एकंदरीत वनवा किंवा आग लागल्यामुळे मनुष्य प्राणी व इतर जीव प्राणी यांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे संकट ओढावत आहे .जीवन चक्रातील अन्नसाखळी तुटत आहे. आगीमुळे जंगलातील छोटी मोठी झाडे झुडपे जळून खाक झाल्यामुळे चाऱ्याची कमतरता जाणून जनावरांना  चारा मिळत नाही .त्यामुळे जनावरांचा भाकड काळ वाढत जातो. दुधाच्या उत्पादनावर परिणाम होतो. वनास आग लागल्यामुळे वैदिक उपचारातील अनेक जडीबुटी, पत्ते जळून खाक होतात.



# वनवा लागू नये म्हणून उपाय #
    जंगलांना आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. जंगल क्षेत्र असणार्या ठिकाणी जंगलांचे महत्त्व कळावे यासाठी माहिती फलक  लावावे.व लोकांची जन जागृती केली पाहिजे. जंगलात आग लागल्याचे दिसताच तात्काळ वन विभागास कळवावे अशावेळी वन खाते अग्निशामक दलास बोलवून आग विझवू शकते तसेच त्यांचे कर्मचारीही आग विझवण्यासाठी प्रयत्न करतात. स्थानिक लोकांनीही बघ्याची भूमिका न घेता आग विझवण्यासाठी प्रयत्न करावेत. आग लागल्यामुळे काय तोटे होतात ते तोटे लोकांना समजून सांगावेत व त्यासाठी वन क्षेत्राजवळील भागात चळवळ निर्माण केली पाहिजे .वनवा रोखण्यासंदर्भात मोहीम राबवली पाहिजे. राखीव वनक्षेत्रात जाण्यास प्रतिबंध केला पाहिजे. वनक्षेत्र विभागात राहणाऱ्या लोकांनी रात्रीचे फिरताना पेटणाऱ्या दिवट्या न घेऊन जाता विजेची बॅटरी घेऊन जावे .जंगलात माचिस घेऊन फिरण्यास सक्त मनाई करावी. तसेच वन विभागात फिरताना बिडी, सिगारेट असे धूम्रपान करण्यासही सक्त मनाई करावी .आणखी एक महत्त्वाचे वन खात्यातील कर्मचाऱ्यांनी सरकारी वन क्षेत्रात वारंवार भेट देऊन त्या ठिकाणी राबता ठेवावा जेणेकरून आग लावणाऱ्यांना भीती वाटेल वन खात्याने जंगल वाढीसाठी ज्या संस्था कार्यकर्ते व्यक्ती काम करतात अशांना पुरस्कार द्यावे किंवा त्यांचा सन्मान करावा. यामुळे एक होईल की हे लोक हिराहिरीने पुढाकार घेऊन जंगल आगीला आळा बसवतील. आग किंवा वनवा आटोक्यात आणण्यासाठी म्हणावी तशी प्रभावी यंत्रणा सध्या तरी दिसत नाही किंवा त्यावेळी आग विझवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते अपुरे पडतात. जंगलात आग लावणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके नेमावित.


रत्नाकर गायकवाड . 


Comments

Popular posts from this blog

नंदीबैल